मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत. त्यांना मुख्यमंत्री असताना अटक केलं. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही कारण लोकांचा कौल होता, असं संजय राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले, की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये खोट्या प्रकरणांमध्ये ईडी आणि सीबीआयचा वापर करत काही लोकांना अडकवलं आहे. या सगळ्यांना अरविंद केजवाल यांच्या सुटकेनं चपराक मिळाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडे विधानसभेत पूर्ण बहुमत आहे. अरविंद केजरीवाल यांचा दोष इतकाच की, देशाच्या राजधानीत त्यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा वारंवार पराभव केला, असा टोला राऊतांनी लगावला.
भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, की इथे भाजपला पराजित केलं. त्यांना यश मिळू दिलं नाही. त्याच्यामुळेच काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली, जसं मला अटक केली आणि देशमुख यांना अटक केली, खोट्या प्रकरणात. गेल्या काही वर्षांपासून या देशांमध्ये लोकशाही म्हणजे जणू एक डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे. त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये ईडी सीबीआय आणि पोलीस यांचा वापर केला जातो, असंही ते म्हणाले..
लोकसभा निवडणुकांच्या निकालाबद्दल बोलताना ते म्हणाले, की 2024 च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही संपवण्याचा जनादेश झाला. त्यांना बहुमत नाकारलं, ते ईडी आणि सीबीआय यांच्या गैरवापरामुळे. याच्यापासून ईडी आणि सीबीआय संस्था बोध घेणार आहे का? असा सवाल त्यांनी केला.
Users Today : 23