बुलढाणा :-
काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून पर्यटकांचे बळी घेतले. या भयानक घटनेत बुलढाणा जिल्ह्यातून गेलेले पर्यटक नशीब बलवत्तर म्हणून बचावले आहेत. बुलढाण्यातून वरिष्ठ पत्रकार अरूण जैन व रणजितसिंह राजपूत हे सहकुटुंब पर्यटनासाठी काश्मीरला गेले आहेत. हे सर्व कुटुंबीय सुखरूप असून, यातील जैन कुटुंबीयांनी तर या गोळीबाराचा थरार अनुभवला आहे. राजपूत कुटुंबीय परतले असले तरी, जैन कुटुंबीय लवकरच बुलढाण्यात सुखरूप परत येणार आहेत.काश्मीरमध्ये सहकुटुंब पर्यटनाला गेलेले जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार तथा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांनी सांगितले, की पहलगाममध्ये काल दुपारी दहशतवाद्यांनी ५० पेक्षा अधिक पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला.मनाला अतीव दुख झाले. ज्या ठिकाणी हे हत्याकांड घडले त्या ठिकाणी आम्ही तीन दिवसांपूर्वी होतो. हाच हल्ला तीन दिवसांपूर्वी झाला असता, आणि आम्ही तिथं असतो तर शहीद झालो असतो. दुसरे, दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार अरूण जैन व त्यांचे कुटुंबीय पर्यटनासाठी काश्मीरमध्ये आहेत. ते सद्या पहलगाममध्येच अडकलेले आहेत. काल पहेलगाममध्ये गोळीबार झाला तेव्हा हे पाच जण तेथील हॉटेलमध्येच होते. ते बाहेर पडणार तोच हॉटेल मालकाने त्यांना थांबविले, व सांगितले की बाहेर जाऊ नका, गोळीबार सुरू आहे. त्यामुळे अरूण जैन व कुटुंबीय सुखरूप पण थोडक्यात बचावले. या कुटुंबात जैन यांच्या पत्नीसह तीन मुलांचा समावेश आहे. गोळीबारच्या आवाजाने जैन कुटुंब चांगलेच घाबरलेदेखील होते. अगदी थोडक्यात ते संबंधीत ठिकाणी जाण्यापासून वाचले व जीवानिशीदेखील बचावले. कालपर्यंत जैन कुटुंबीय पहलगाम येथील हॉटेलमध्येच होते. आज ते तेथून बाहेर पडण्याची शक्यता आहे. या कुटुंबात ज्येष्ठ पत्रकार अरूण जैन यांच्यासह नीलेश जैन, पारस अरूण जैन, ऋषभ अरूण जैन, सौ. श्वेता नीलेश जैन, अनुष्का नीलेश जैन यांचा समावेश असून, ते सर्व बुलढाणा येथील रहिवासी आहेत.
Users Today : 222