मोताळा:- तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील घुस्सर बुद्रूक शिवारात लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली. मका, ऊसाचे पीक तसेच ठिबक पाइप, कांद्याचे बीज जळून खाक झाले. २८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तालुक्यात १५ दिवसांत तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.
तालुक्यातील तळणी येथील श्यामसुंदर राठी यांची घुस्सर बुद्रुक येथे गट क्रमांक ६५ मध्ये तसेच गट क्रमांक ५६ मध्ये बन्सीलाल फत्तेलाल राठी तसेच गट क्रमांक ५६ मध्ये नवलकिशोर जेठमल राठी यांची शेती आहे. २८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. यात श्यामसुंदर राठी यांच्या ०.६० हेक्टर क्षेत्रातील ६० क्विंटल मका जळून खाक झाल्याने त्यांचे १ लक्ष २५ हजारांचे नुकसान झाले.बन्सीलाल राठी यांच्या शेतापर्यंत आग पोहचल्याने त्यांचा १.२० हेक्टर क्षेत्रातील २ टन ऊस जळाले. तसेच २० बंडल ठिबक नळ्या, ३९ पाइप असे ७० हजारांचे साहित्य तसेच नवलकिशोर राठी यांचे ०.१५ हेक्टर क्षेत्रातील कांदा बीज जळाल्याने २८ हजार तसेच ७ बंडल ठिबक, ८ पाइप असे १७हजार असे तिन्ही शेतकऱ्यांचे २ लाख ५४ हजारांचे साहित्य आगीत जळून खाक झाले.शेलापूर बुद्रुक ग्राम महसूल अधिकारी दीपाली एस. इंगोले व कृषी सहायकांनी २९ एप्रिल रोजी घटनास्थळी पोहचून नुकसानीचा पंचासमक्ष पंचनामा केला.श्यामसुंदर राठी यांचे १ लाख २५ हजार, बन्सीलाल राठी यांचे ८४ हजार तर नवलकिशोर राठी यांचे ४५ हजार असे २ लाख ५४ हजाराचे नुकसान झाल्याचा अहवाल मोताळा तहसील प्रशासनाला पाठविला आहे. यावेळी शेतकरी श्यामसुंदर राठी, नवलकिशोर राठी तसेच निलेश पाटील, कुणाल पाटील, रा.ऊ. मुके, प्रशांत पाटील, गजानन पाटील, रावजी सुरळकर, नारायण नारखेडे, सागर मुके, संजय जाधव, भरत मुके, अजय पाटील उपस्थित होते.
Users Today : 1