दुसरबीड:-विशेष प्रतिनिधी
सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा गावाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत एक मोठा टप्पा गाठला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात गावात एकही क्षयरोग (टीबी) रुग्ण आढळून न आल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत रूम्हणा गावाला ‘टीबी मुक्त गाव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र दिनी झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशामागे आरोग्य यंत्रणेचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंगणे, आरोग्य सेवक राजू घुगे आणि आरोग्य सेविका वैशाली गवई यांनी घराघरात जाऊन जनजागृती केली, तपासण्या केल्या आणि आवश्यक त्या उपचारांची व्यवस्था केली. टीबी हा संसर्गजन्य रोग असून योग्य उपचार आणि जनजागृतीमुळे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. तथापि, ग्रामीण भागात अजूनही अज्ञान, भीती आणि टाळाटाळ यामुळे रुग्ण दडवले जातात. त्यामुळे हा आजार नियंत्रणात आणणे हे मोठे आव्हान असते. मात्र, रूम्हना गावाने या आव्हानाला यशस्वीरीत्या सामोरे जात आरोग्य यंत्रणेसोबत समन्वय साधून हे घवघवीत यश संपादन केले आहे.पुरस्कार वितरण समारंभावेळी उपसरपंच शिवगंगा जायभाये, ग्रामपंचायत सदस्य शिवराज कायंदे, अंगणवाडी सेविका लता जायभाये, ग्रामपंचायत अधिकारी विनोद सातपुते, कर्मचारी हरिभाऊ जायभाये, संदीप कायंदे, तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशामुळे रूम्हणा गावाने इतर गावांसाठी एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे. आरोग्य क्षेत्रात अशा प्रयत्नांमुळे ‘टीबी हारेगा, देश जीतेगा’ या संकल्पनेला खरे रूप प्राप्त होत आहे.
Users Today : 8