बुलडाणा:- जिल्हा प्रतिनिधी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चार लाख ७२ हजार ५८४ शेतकऱ्यांसाठी तब्बल ६३५ कोटी ७४ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मोठी आर्थिक मदत मंजूर झाली असून, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.यापूर्वी विमा कंपनीने केवळ १४४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले होते, मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री जाधव यांनी थेट विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण दाव्यानुसार रक्कम मिळावी, यासाठी चर्चा केली होती. शेतकऱ्यांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होत आहे. १६० दावे प्रलंबित ! सध्या राज्य शासनाकडे १६० दावे प्रलंबित असून, त्यासाठीही कृषी विभाग व संबंधित मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. ही प्रकरणे मंजूर झाल्यानंतर नुकसानभरपाईची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. कृषी संकटांनी त्रस्त शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. पावसाअभावी किंवा निसर्गाच्या अनिष्ट परिणामांमुळे पीक उत्पादनात मोठी घसरण झाली होती.
Users Today : 15