लोणार:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील हिरडव येथील शेतकरी संतोष रामभाऊ भांदुर्गे यांच्या शेतातील गुरांचा गोठा व कांदा चाळ यांना गुरूवारी अचानक लागलेल्या आगीमुळे जवळपास सहा लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.हिरडव जांबुल शेत रस्त्याला लागून असलेल्या संतोष भांदुर्गे यांच्या शेतातील गुरांचा गोठा व त्या शेजारी असलेल्या कांदा चाळीला सायंकाळी पाचच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कांदा चाळमध्ये ठेवण्यात आलेला ४० क्विंटल कांदा, १५ क्विंटल ठेवलेला लसूण, तीन स्पिकलर सेट, तीन एकरचे ठिबक, गुरांसाठी साठवून ठेवलेले कुटार, शेतीचे साहित्य, असे जवळपास सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. भांदुर्गे यांच्याघरी ९ मे रोजी लग्न असल्यामुळे घरातील सर्व मंडळी हळदीच्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी घरीच होती. आग लागण्याची माहिती मिळतात त्यांनी शेत गाठले व लोणार येथील अग्निशामक दलाला आगीची माहिती दिली.अग्निशामक दल पोहचेपर्यंत कांदा चाळ व त्यामध्ये ठेवलेली सर्व साहित्य जळून खाक झाले. लग्नाच्या पूर्वी संधीला गोठाला व कांदा चाळीला आग लागून नुकसान झाल्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले.
Users Today : 15