सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी
तीन दिवसांपूर्वीच बाळसमुद्र येथील गणेश भंडारे या जवानाचे थाटामाटात लग्न झाले. मात्र, युद्धाची परिस्थिती पाहता तातडीने बोलाविणे आले आणि हळद फिटली नसतानाच जवानाला जम्मू येथे तैनात व्हावे लागले. पत्नी, कुटुंबीय, नातेवाइक आणि ग्रामस्थांना यावेळी गहिवरून आले. यशस्वी हो म्हणत भंडारे यांना सीमेवर लढण्यासाठी पाठविण्यात आले. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध भडकल्याने सुटीवर आलेल्या सैन्यदलाच्या जवानांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. सर्वांना तातडीने बहुतांश सैनिक पुन्हा सीमेवर तैनात होण्यासाठी मिळेल त्या वाहनाने निघाले. तालुक्यातील बाळसमुद्रचे रहिवासी सैनिक गणेश भंडारे यांनादेखील तत्काळ कर्तव्यावर पोहोचावे लागले.जम्मू येथे सैन्यात कार्यरत असलेले गणेश भंडारे यांचा विवाह ६ मे रोजी मोठ्या आनंदाने पार पडला. आपल्या लग्नाकरिता त्यांनी काही दिवसांची रजा टाकली होती. भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाल्याने सैनिकांना तातडीने बोलाविणे आले. त्यामुळे गणेश भंडारे हेदेखील तत्काळ कर्तव्यासाठी निघाले.मंगळवार, ६ मे रोजी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील गजानन राऊत यांची मुलगी शिवानीसोबत गणेश भंडारे यांनी लग्नगाठ बांधली. नवरीला घरी आणल्यानंतर सुखी, संसाराची दोघांनी स्वप्ने रंगविली. लग्नाची हळद फिटली नसतानाच ९ मे रोजी त्याला परत जावे लागले. परतताना कठीण काळात देशसेवेपेक्षा कोणतेही मोठे काम नसल्याचे म्हणत, कुटुंबीय, मित्र व ग्रामस्थांना धीर देत देशसेवेचा स्वाभिमान बाळगून गणेश भंडारे कर्तव्यावर परतला आहे.
Users Today : 15