दुसरबीड:-विशेष प्रस्तिनिधी
सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती तस्करीचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना आव्हान देणारी घटना १० मे रोजी निमगाव वायाळ येथे समोर आली. जेव्हा अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी उभी करण्यात आलेली सरकारी गाडी अज्ञात तस्करांच्या दगडफेकीचा बळी ठरली. हल्लेखोरांनी गाडीची समोरील काच फोडल्याने प्रशासनाच्या इभ्रतीचे वाभाडे निघाले असून तहसीलदार अजित दिवटे यांनी चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी तस्करी रोखण्यासाठी रस्त्यावर उभी करण्यात आली होती. परंतु काहीच दिवसांत तस्करांनी थेट प्रशासनाच्या वाहनावर हल्ला करणे, हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा उग्रपणा दर्शवणारा प्रकार आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, दुसरबीड, निमगाव वायाळ, लिंगा आदी भागात अवैध रेती उत्खनन थांबवण्यासाठी नेमले गेलेले ‘बैठे पथक’ काही दिवसांपूर्वी अचानक बंद करण्यात आले. अनेक माध्यमांतून या पथकाचे ‘मॅनेज’ झाल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. त्यानंतर तहसीलदारांनी काही महसूल अधिकाऱ्यांना शोकॉज नोटिसा दिल्या. परंतु कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे समजते.या पथकाच्या रद्दीकरणामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली असून, तस्करांना मोकळे रान देण्यासाठीच पथक हटवण्यात आले का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. तसेच प्रशासनाच्या या निर्णयामुळे तस्करांना अप्रत्यक्ष पाठींबा मिळाल्याची चर्चा जनतेत आहे. सध्या तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, जिल्हा प्रशासनाने यावर तातडीने आणि कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.
Users Today : 18