मेहकर :- शहर प्रतिनिधी
गत पंधरा दिवसांपासून मेहकर शहर कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करत आहे. त्यामुळे नागरिक तहानेने व्याकुळ असून, नगरपालिकेच्या उदासीन धोरणाला त्रस्त झाले आहेत. सूर्य आग ओकत असल्याने वैशाख वनव्यात जनजीवन होरपळत आहे. अनेक जलस्रोत आटले असून काही जलस्रोतांनी तळ गाठला आहे. तर बोरवेल सुद्धा कोरडे झाले आहेत. त्यामुळे मे महिन्यात जनता मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या पाणीपुरवरच अवलंबून आहे. मात्र, गत पंधरा दिवसांपासून नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या नळांना पाणी येणेच बंद झाले आहे. त्यामुळे मेहकर शहरातील जनता कृत्रिम पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे.
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेसाठी ७५ अश्वशक्तीचा एक व ६० अश्वशक्तीचा स्टॅन्ड बाय मोटार पंप आहे. वर्तमान स्थितीत ७५ अश्वशक्तीचा मोटारपंप
जळाल्यामुळे ६० अश्वशक्तीच्या स्टैंडबाय मोटर पंपाच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा होत होता. मात्र, साठ अश्वशक्तीच्या मोटार पंपाने पाण्याची टाकी भरण्यासाठी
निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे जल वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर हिवरा आश्रम या ग्रामीण भागातील सबस्टेशन वरून एक्सप्रेस फीडर बसवण्यात आला आहे. मात्र, या फिडरवरून झालेला विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने शहराला नियमित पाणीपुरवठा करताना अडथळा निर्माण होतो. त्यासाठी नवीन एक्सप्रेस फिडर बसवणे आवश्यक आहे. यासह ७५ अश्वशक्तीचा स्टैंडबाय मोटार पंप नव्याने खरेदी केल्या जाणार असल्याची माहिती नगरपालिका मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून मेहकरच्या पाणीपुरवठा योजनेच्या विस्कळीत कारभाराचा अनुभव जनतेसाठी जुनाच आहे. पाणीपुरवठा विभागाला वर्तमानस्थितीत अभियंताच
नाही. सद्यस्थितीत अभियंता ढेपले यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त भार आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता, जळालेला ७५ अश्वशक्तीचा मोटारपंप दुरुस्त झाला असून आता तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात नगर प्रशासनाने जनतेकडून सक्तीने कर वसुली करून आपली तिजोरी भरण्याचे काम केले होते. मात्र, जनतेला नियमित मूलभूत सुविधा उपलब्ध करून देताना जनता कर भरते हे नगर प्रशासन विसरते की काय? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे .
Users Today : 18