बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे साफ दुर्लक्ष करत आहे. शेतकरी प्रचंड संकटात असताना सरकार झोपेचे सोंग घेत आहे. पण आम्ही शेतकरी या देशाची भूक भागवणारे आहोत. आमच्या हक्कांसाठी आता तडजोड करणार नाही. बहिऱ्या शासनाला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांचा गगनभेदी आवाज करू, हक्काच्या कर्जमुक्ती व उर्वरित पिकविम्यासाठी राज्यभर आंदोलन उभारू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा येथे ८ मे २०२५ रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने एल्गार मेळावा पार पडला. त्यावेळी तुपकर बोलत होते. यावेळी तुपकर यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून टीका केली. शासन जर शेतकरी शेतमजूर आणि सर्व सामान्यांचे प्रश्न दुर्लक्षित करणार असेल, तर रस्त्यावरून दिल्ली पर्यंतचा आवाज बुलंद केला जाईल. हा फक्त एल्गार नाही तर हे निर्णायक संघर्षाचं रणशिंग आहे, असा आक्रमक इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी केला. कर्जमाफीचं काय? घोषणाबाजी करायची आणि अंमलबजावणी शून्य? पीकविमा कुठं गेला? पावसाळा बघायची वेळ आली पण शेतकऱ्याच्या खात्यात अजून एक रुपयाही नाही? प्रजन्यमापक यंत्र फसवतात आणि विमा कंपन्या गोंधळात गाडून टाकतात, हे आम्ही किती दिवस सहन करायचं?, एकिकडे फळबागा लावायला सरकार सांगत, पण फळबागांचा पिकविम्यात समावेश नाही हे काय धोरण आहे? शेतमालाला हमीभाव नाही, नुकसानभरपाई मिळत नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीच उपाय योजना नाही. तर दुसरीकडे शेतकरी पुत्रांच्या हाताला काम नाही, रोजगार नाही, नोकऱ्या नाहीत मग आम्ही जगायचं कसं?’ असा प्रश्न उपस्थित करत रविकांत तुपकरांनी सरकारला धारेवर धरले.
Users Today : 20