चिखली :- तालुका प्रतिनिधी
खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची मालिका अद्याप थांबलेली नाही. टप्पा क्र. १ ते ४ वरील कालवे व वितरिका यांची देखभाल व दुरुस्ती वेळेवर न झाल्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आता संबंधित विभागाला उशिरा का होईना, शहाणपण सुचले असून त्यांनी कालव्यांची साफसफाई सुरू केली आहे. मात्र, झाडे व झुडपे कालव्यातच फेकल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतीला पुन्हा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.खकडपूर्णा उपसा सिंचन टप्पा क्र. ४ वरील कोलारा वितरिकेच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर उगवलेली झाडे-झुडुपे रब्बी हंगामापूर्वी काढणे गरजेचे होते. मात्र, संबंधित विभागाने थातूर-मातूर काम केल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मोठे नुकसान सोसावे लागले. हीच स्थिती टप्पा क्र.१ ते ४ वरील सर्व कालव्यांच्या बाबतीत घडली. योग्य वेळी देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे शेतात पाणी पाझरून सुमारे ३०० एकरावरील शेती रब्बी पिकांचे नुकसान झाले, तर शेवटच्या टोकापर्यंत पाणीच न पोहचल्याने पाण्यावाचून पिके करपली.या पृष्ठभूमीवर सर्वच स्तरांवरून रोष व्यक्त होत होता. दरम्यान, कालव्याच्या कडेला उगवलेली झाडे मोठी झाली असल्याने व त्यांची मूळ ही कालव्याच्या अस्तरात शिरल्यामुळे अस्तर पूर्णतः उखडण्याचा मार्गावर होते. या अनुषंगाने झाडे-झुडपे काढण्यात येत आहेत. मात्र, हे करीत असताना कोलारा वितरिकेवरील झाडे-झुडपे व मोठ्या झाडांची खोड त्याचा वितरिकेत टाकल्या गेली आहेत.खरीप हंगामापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी खरीप हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला आहे. त्यामुळे, संबधीत विभागाने कालव्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच तोडलेली झाडे झुडुपे कालव्यांच्या बाहेर काढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जून महिन्यात खरीपाच्या पेरण्या होण्याची शक्यता आहे.
Users Today : 21