“मिशन मुक्ती” अंतर्गत गणेशपेठ पोलिसांची रेस्क्यू कारवाई : 23 बेघर व्यक्तींचे पुनर्वसन
नागपूर : मा. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “मिशन मुक्ती” उपक्रमांतर्गत गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीत दि. 21 मे 2025 रोजी बेघर, निराधार व्यक्तींवरील रेस्क्यू कारवाई करण्यात आली. संत्रा मार्केट व चांद शहावली दर्गा परिसरात राहणाऱ्या, रस्त्यावर भीक मागणाऱ्या व प्रवाशांना त्रास देणाऱ्या लोकांविरुद्ध ही संयुक्त कारवाई राबवण्यात आली.

या कारवाईत एकूण 23 जणांना – ज्यात 6 पुरुष, 4 महिला व 13 बालकांचा समावेश आहे – ताब्यात घेऊन त्यांचे आस्था निवारा केंद्र, घाट रोड येथे पुनर्वसन करण्यात आले. या मोहिमेपूर्वी काही नागरिकांनी प्रतिकार केला, मात्र त्यांना समजावून सांगताच त्यांनी सहकार्य केले.
ही संयुक्त कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांच्या पुढाकाराने आणि नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग झोन 4चे कनिष्ठ अभियंता अनंत मानकर, अतिक्रमण पथक प्रमुख शैलेश हुमणे, सामाजिक सुरक्षा विभाग, बेगर स्कॉड, महिला व बालकल्याण विभाग यांच्या समन्वयातून यशस्वीरीत्या पार पडली. पोलिस नियंत्रण कक्षामार्फत आवश्यक मनुष्यबळ व वाहनाचीही सोय करण्यात आली होती.

या वेळी परिसरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात आली आणि अतिक्रमण पथकाने निरुपयोगी साहित्य हटवले.
पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले की, “मिशन मुक्ती” उपक्रम फक्त पोलिसांचा नाही, तर समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने चालवला जात असून नागपूरमधील विविध संस्था व नागरिक स्वतःहून पुढे येत या अभियानात सहभागी होत आहेत. नागपूर पोलिसांच्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
Users Today : 21