मेहकर, दि. ३१ (प्रतिनिधी)
राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. रब्बी हंगामातील पेरणीसाठी तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून अमरावती विभागासाठी एकूण ७४७ कोटी ८७ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
या निर्णयाचे माजी आमदार संजय रायमूलकर यांनी स्वागत करताना म्हटले की, “महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला हा आर्थिक आधार वेळेवर आणि अत्यंत आवश्यक आहे. बुलढाणा जिल्हा, विशेषतः मेहकर व लोणार तालुक्यांतील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.”
शासनाचा निर्णय व विभागनिहाय मदत
महसूल व वन विभागाचे सहसचिव संपत सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासकीय परिपत्रकानुसार, राज्यातील पुणे, नाशिक, सातारा, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि अमरावती विभागातील जिल्ह्यांसाठी एकूण १७६५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
या मदतीतून अमरावती विभागाला सर्वाधिक ७४७ कोटी ८७ लाख रुपयांचा वाटा मिळणार असून, त्यामुळे या विभागातील हजारो शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी आवश्यक आर्थिक साहाय्य मिळेल.
राज्य नेतृत्वाचे अभिनंदन
या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, कृषीमंत्री दत्ता भरणे, तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत माजी आमदार संजय रायमूलकर म्हणाले की, “अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे नवसंजीवनी मिळेल. शासनाने केलेली ही घोषणा ही केवळ मदत नसून शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने पाठीशी उभे राहण्याची कृती आहे.”
Users Today : 26