नांदुरा, दि. ३१ (प्रतिनिधी)
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्यासाठी ‘वॉक फॉर युनिटी’ आणि ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी सांगितले की, “सरदार पटेल यांनी देशातील संस्थानांचे विलीनीकरण करून खरी राष्ट्रीय एकता प्रस्थापित केली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजात ऐक्य आणि सलोखा वाढविणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे.”
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आवाहनानुसार ३१ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक क्रांती डाहवा-ढाकणे यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. त्यानंतर शहरातील विविध भागातून निघालेल्या ‘रन फॉर युनिटी’ रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला.
या उपक्रमात पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, लायन्स क्लब सदस्य, सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती नांदुरा खुर्दचे पदाधिकारी, पत्रकार आणि शहरातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. देशातील ऐक्य, अखंडता आणि बंधुतेचा संदेश देत रॅलीत “एक भारत, श्रेष्ठ भारत”च्या घोषणा देण्यात आल्या.
Users Today : 28