चिखली : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, २९ जानेवारी रोजी चिखली शहरात सर्वपक्षीय बंद शांततेत पाळण्यात आला.
या बंदला शहरातील व्यापारी, शैक्षणिक संस्था तसेच काही खासगी आस्थापनांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा देत साश्रूनयनांनी स्व. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षितिजावर लखलखणारा तारा कायमचा मावळल्याची भावना यावेळी सर्वत्र व्यक्त होत होती. स्व. अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघात तीव्र शोक व्यक्त करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बंद पाळण्याचे आवाहन आमदार श्वेता महाले पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे यांनी संयुक्तपणे केले होते. त्यांच्या आवाहनाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या सर्वपक्षीय बंद व श्रद्धांजली कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, चिखली नगर परिषदेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, अंकुशराव पाटील, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, कपिल खेडेकर, मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, काँग्रेसचे सचिन बोंद्रे, अथर काजी, सुरेंद्र ठाकर, अमोल सुरडकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
Users Today : 0