मलकापूर, दि. ४ (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या हितासाठी मका खरेदी केंद्रांचे टार्गेट वाढवून तातडीने खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश नारखेडे यांच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
सध्या सुरू असलेली शासकीय मका खरेदी अचानक बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. प्रत्येक खरेदी केंद्रावर सुमारे एक हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना प्रत्यक्षात केवळ दोनशे शेतकऱ्यांचाच मका मोजणीस आला आहे. उर्वरित शेतकरी अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असून ‘टार्गेट संपले’ हे कारण पुढे करून खरेदी थांबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शासनाने मका पिकाला प्रति क्विंटल *२४०० रुपये* हमीभाव जाहीर केला असतानाही बाजारात मात्र मका अवघ्या *१५०० रुपयांना* विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे *९०० रुपयांचा आर्थिक तोटा* सहन करावा लागत असून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
मका खरेदी केंद्रांचे टार्गेट तातडीने वाढवून शासकीय दराने खरेदी सुरू न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष नीलेश नारखेडे यांच्यासह श्रीकृष्ण म्हैसागर, विशाल मोरे, प्रमोद सपकाळ, सुरेश सपकाळ, सुनील भोकरे, शरद लांडे, किरण मालठाणे, राम मालठाणे, अंबादास म्हैसागर, माणिकराव म्हैसागर, भास्कर मालठाणे, गजानन मालठाणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
Users Today : 134