अकोला, दि. ४ (प्रतिनिधी) –
स्थानिक एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (रा. से. यो.) विशेष शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना वाणिज्य विभागप्रमुख प्रा. राहुल माहुरे यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे राष्ट्रनिर्मितीचा भक्कम पाया आहेत” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. नागनाथ गुट्टे होते. यावेळी महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. मोनिका साबू, प्रा. प्रकाश गवई, प्रा. उज्ज्वला डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. प्रकाश गवई यांनी करून दिला. आपल्या व्याख्यानात प्रा. राहुल माहुरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय योगदान आजही देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले. बाबासाहेबांचा संघर्षमय जीवनप्रवास, शिक्षणाचे महत्त्व सांगणारा त्यांचा संदेश आणि भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतील अतुलनीय योगदान यावर त्यांनी उदाहरणे व संदर्भांसह सविस्तर मांडणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून ते एक महान अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, राजकीय अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ, कामगार व स्त्री-मुक्तीचे समर्थक होते, असे नमूद करण्यात आले. त्यांनी आयुष्यभर समता, स्वातंत्र्य व बंधुत्वासाठी संघर्ष केला. “शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा” हा त्यांचा संदेश केवळ विचार न राहता जगण्याचा मार्ग असल्याचे प्रा. माहुरे यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे संचालन कु. पलक उज्जेनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. हर्षा घोगरे यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 114