बई प्रतिनिधी :
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर ज्वलनशील रसायन वाहून नेणारा टँकर मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी पलटी झाल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातानंतर तब्बल ३२ तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत राहिली. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
रात्रीच्या अंधारात तासन्तास अडकून पडलेली वाहने, रडणारी लहान मुले, खाण्या-पिण्याची गैरसोय तसेच पाण्याच्या टंचाईमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत हजारो वाहनचालक आणि प्रवासी महामार्गावर अडकून पडले होते.
या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीका केली. अर्थसंकल्पात मुंबई–पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा करण्यात आली असली, तरी त्याआधी सध्याचा प्रवास सुरळीत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या काळात प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला टोल सरकारने परत करावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. मूलभूत सुविधा न देता टोल वसूल करणे योग्य नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवणे आवश्यक होते, मात्र अशा घटनांनंतर कमीत कमी वेळेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडे ठोस कृती आराखडा होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. द्रुतगती मार्गाला २४ वर्षे पूर्ण होत असताना आपत्ती व्यवस्थापनाबाबत पुरेशी तयारी का करण्यात आली नाही, याबाबतही चर्चा सुरू आहे.
मुंबई आणि पुणे ही राज्याच्या विकासाची प्रमुख केंद्रे मानली जात असताना या दोन शहरांदरम्यान तब्बल ३२ तास वाहतूक ठप्प राहणे गंभीर असल्याचे मत व्यक्त होत आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ३२ तास ठप्प; टँकर अपघातानंतर प्रवाशांचे हाल, टोल परताव्याची मागणी
0
9
4
9
2
3
Users Today : 95
Leave a comment