मूर्तिजापूर, दि. ६ (प्रतिनिधी) :
सध्याच्या धावपळीच्या युगात तरुण पिढी आणि विद्यार्थी वर्ग मोबाईलच्या आहारी जात असून तंबाखू, गुटखा यांसारख्या व्यसनांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमती देवकाबाई पाटील विद्यालय, घुंगशी येथे ‘व्यसनमुक्ती आणि मोबाईलचे दुष्परिणाम’ या विषयावर विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रसिद्ध वक्ते राजेंद्र समाधान भटकर यांनी आपल्या खास वऱ्हाडी शैलीतून व नाट्यरूपी संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या भटकर यांनी मोबाईलच्या अति वापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारे दुष्परिणाम अत्यंत प्रभावीपणे मांडले.
भटकर यांनी केवळ उपदेश न करता, छोट्या नाटिकांच्या माध्यमातून व्यसनाधीनतेमुळे आयुष्याची कशी हानी होते, याची उदाहरणे सादर केली. तसेच आई-वडील, गुरुजन आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर राखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
त्यांच्या विनोदी शैलीतील संवादामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या सवयींबाबत आत्मपरीक्षण केले. व्यसनांपासून दूर राहून उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संदेश विद्यार्थ्यांना मिळाला.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक जी. एम. घाटे यांनी पुढाकार घेतला. यावेळी शिक्षक ए. एन. जाधव, दिव्या गवळी, तसेच कर्मचारी गावंडे, वानखडे, आठवले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता भक्तीमय वातावरणात ‘पसायदान’ म्हणत करण्यात आली
Users Today : 36