साखरखेर्डा, दि. ७ (प्रतिनिधी) –
विवाह सोहळा, बाजार किंवा प्रवासासाठी जाताना अनेक महिला सोन्याचे दागिने अंगावर घालून बाहेर पडतात. मात्र अशावेळी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक असून, सध्या काही महिला चोरट्यांच्या मदतीने चोरीच्या घटना घडवत असल्याचे प्रकार वाढत आहेत.
साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात २९ जानेवारी रोजी असाच प्रकार घडला. गावातील एका तथाकथित महिलेने वयोवृद्ध महिलेची चौकशी करत घरात कोण राहते, तसेच तिच्या अंगावरील दागिने अस्सल आहेत की नकली याची खातरजमा केली. ही महिला नेहमी फिरस्त्यावर असून मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन व साखरखेर्डा येथील आठवडी बाजारात सतत फिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
सदर महिला दागिने घातलेल्या महिलांशी गोडगोड बोलून त्यांच्याकडून माहिती मिळवते आणि संधी साधून गळ्यातील पोत लंपास करते, असा आरोप आहे.
काही महिन्यांपूर्वी साखरखेर्डा येथील आठवडी बाजारात जीवन गवई यांच्या पत्नीच्या गळ्यातील पाच तोळ्यांची पोत अशाच प्रकारे गायब झाल्याची घटना घडली होती. याशिवाय बाजारात आलेल्या महिलांचे पाकिट मारणे, मोबाईल चोरी करणे असे प्रकारही सराईतपणे होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
खरेदी पावती जपून ठेवण्याचे आवाहन
दरम्यान, दागिन्यांची चोरी झाल्यानंतर पोलिसांकडून सर्वप्रथम दागिन्यांची खरेदी पावती मागितली जाते. पावती उपलब्ध नसल्यास तक्रार नोंदवताना अडचणी येतात. त्यामुळे महिलांनी जुने दागिने खरेदी करतानाच्या पावत्या सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 32