वाशीम, दि. ८ (प्रतिनिधी) :
इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून डिजिटल व्यवहार तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
सुरक्षित व जबाबदारीने इंटरनेट तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे १० फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद येथील स्व. वसंतराव नाईक सभागृहात जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. या कार्यशाळेमध्ये महिला, विद्यार्थी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापर, सायबर स्वच्छता आणि सायबर धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत माहिती सुरक्षा शिक्षण व जनजागृती प्रकल्पाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, जिल्हा सूचना व विज्ञान केंद्र (एनआयसी) मार्फत इंटरनेट सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ही जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय विभाग, संस्था व जिल्हा प्रशासनाने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी केले आहे.
Users Today : 11