संग्रामपूर, दि. ९ (प्रतिनिधी) :
संग्रामपूर तालुक्यातील शेवगा बुद्रूक (शेतखेडा) येथे शौचास गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला दोन आरोपींनी बळजबरीने मक्याच्या शेतात उचलून नेऊन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा तपशील
पीडित अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह शेवगा बुद्रूक (ता. संग्रामपूर) येथे राहते. ती ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास गावाजवळील पडीत शेतात शौचास गेली होती.
त्यावेळी संदीप सपकाळ यांच्या मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या रोशन संतोष मोहीते (वय १९) व विजय शालीग्राम जाधव (वय २०) या दोन आरोपींनी पीडितेवर अचानक झडप घातली.
बळजबरीने शेतात नेऊन विनयभंग
आरोपी रोशनने पीडितेला मागून तर विजयने समोरून पकडून “आमच्या सोबत मक्याच्या शेतात चल” अशी निर्लज्ज मागणी केली. पीडितेने विरोध केला असता, आरोपींनी तिचे तोंड दाबून तिला बळजबरीने शेतात उचलून नेले.
त्यानंतर तिला जमिनीवर पाडून तिचा विनयभंग केला. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी “जर कोणाला काही सांगितले तर पुन्हा असेच करू आणि तुला जीवाने मारून टाकू” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोक्सो व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडितेने तामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८(१)(एक), ३५१(२), ३(५) तसेच पोक्सो कायदा कलम ८, १२ आणि अॅट्रॉसिटी कायदा कलम ३(१)(डब्लू)(आय)(आय आय), ३(२)(व्हीअ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Users Today : 9