लोणार, दि. १२ (प्रतिनिधी) :
दैनंदिन जीवन मंगलमय ठेवायचे असेल तर सदैव प्रसन्न राहणे आवश्यक आहे. चुकीच्या मार्गाने कमविलेली संपत्ती धर्मआराधनेतून सतमार्गी लावावी आणि कुणाच्याही दुःखाचे कारण न बनता आनंदाचे माध्यम बनावे, असे प्रेरणादायी प्रतिपादन प.पू. चैतन्यश्री म.सा. यांनी केले.
स्थानिक गेलडा भवन येथे आयोजित प्रवचनमालेच्या दुसऱ्या दिवशी त्या उपस्थितांना मार्गदर्शन करत होत्या. यावेळी जैन समाजासह सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प.पू. चैतन्यश्री म.सा. म्हणाल्या की, मनुष्याने जीवनात प्रसन्नता व सकारात्मकता जोपासली तर अनेक अडचणी आपोआप दूर होतात. संपत्ती ही केवळ उपभोगासाठी नसून समाजहित व धर्मकार्यासाठी वापरणे हीच खरी आराधना आहे. चुकीच्या मार्गाने मिळविलेल्या धनामुळे मनःशांती हरवते; मात्र त्याच संपत्तीचा उपयोग सत्कार्यासाठी केल्यास जीवन पवित्र आणि मंगलमय होते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प.पू. साध्वी सुबोधीजी म.सा. यांनी कृतज्ञतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, जैन धर्मात मानवजन्म मिळणे ही अत्यंत दुर्मिळ संधी आहे. अरिहंत प्रभू, धर्माची प्रेरणा देणारे साधू-भगवंत, जन्मदाते आई-वडील, जीवनसाथी तसेच आयुष्यात मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी दिला.
प्रवचनानंतर उपस्थितांनी समाधान व्यक्त करत धर्मआराधनेचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
Users Today : 3