संग्रामपूर, दि. १२ (प्रतिनिधी) :
आधीच्या काळात तपश्चर्या केली जायची, आज साधना केली जाते. पार्वतीने शिवाची साधना केली होती, त्यामुळे तिला शिव भगवान पती म्हणून प्राप्त झाले. दुसरीकडे पार्वतीच्या भविष्यातच असे पती होते, असेही सांगितले जाते. आपले मन, मनगट आणि मेंदू आपली भविष्यातील दिशा ठरवते, असे प्रतिपादन ह.भ.प. नागेश महाराज आगलावे (बोरखेडकर) यांनी केले.
पातुर्डा येथे सुरू असलेल्या शिवपुराण कथामालेच्या चौथ्या पुष्पगुंफण प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, प्राचीन काळात अनेक विधी होते आणि त्या काळातील साधनाही अत्यंत शक्तिशाली होत्या. ऋषीमुनी कठोर तपश्चर्या करीत असल्यामुळे त्यांच्या शब्दांना वजन आणि सामर्थ्य प्राप्त होत असे. आज तशी साधना करणारे लोक अपवादानेच आढळतात.
महाराजांनी सांगितले की, कोणाला काही मागायचे असेल तर तो मंदिरात जातो, पण मंदिरात मागण्यासाठी जाऊ नका; भगवंतांनी आतापर्यंत जे दिले त्याबद्दल आभार मानण्यासाठी मंदिरात जा, असा संदेश त्यांनी दिला.
दरम्यान, शिवपुराण कथेदरम्यान आज शिव-पार्वती विवाहाची प्रतिकृती सादर करण्यात आली. या प्रसंगाला भक्तांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पातुर्डा येथील विजय बोराखडे व त्यांच्या पत्नीने शिव-पार्वतीची भूमिका साकारली.
उद्या गणपती जन्माची कथा
शिवपुराण संगीतमय कथामालेत अत्यंत गोडवा निर्माण झाला असून महाराजांनी दिलेल्या दृष्टांतांना श्रोत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. उद्या गणपती जन्माची कथा होणार आहे. चौथ्या दिवशी शिवतीर्थावर भाविकांची अलोट गर्दी झाली होती. गर्दी लक्षात घेता मंडप वाढवण्यात आला असून उद्या आणखी गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Users Today : 4