कारंजा प्रतिनिधी :
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ केंद्रीय प्रचार विभाग व श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमद्वारे संचालित श्री गुरुदेव सेवा मंडळ महिला भजनी मंडळ, शांतीनगर आकाशदीप कॉलनी, कारंजा शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय समन्वयक विचार मंथन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ‘सर्व संत स्मृतीदिन महोत्सव’ अर्थात मानवता दिन म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
कार्यक्रम २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता सुरू होऊन २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत श्री गुरुदेव सेवाश्रम, ग्रामनाथ भवन, शांतीनगर येथे पार पडणार आहे. या संमेलनात श्री वारकरी संप्रदाय, श्री दत्त संप्रदाय तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार आहेत.
संमेलनात पद्मश्री बोथे गुरुजी, वेरूळकर गुरुजी, ठाकूर बुवा, शिंदे महाराज, डॉ. मीराबाई गरुड, काठोळे महाराज, लक्ष्मणदास काळे महाराज, गव्हाळे महाराज, सालोडकर महाराज, काळे महाराज, गुंजाटे महाराज आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
संतांच्या विचारातून मानवतेचा बोध घ्यावा आणि जीवन उन्नत करण्यासाठी संतसंग आवश्यक आहे, हा संदेश या विचारमंथनातून दिला जाणार आहे.
या दोन दिवसीय संमेलनाला जिल्ह्यातील तसेच कारंजा शहर व तालुक्यातील सर्व धार्मिक संघटनांनी, महिला-पुरुष भजनी मंडळांनी, वारकरी व दत्त संप्रदायाच्या अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार गुंजाटे महाराज, अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी सुनील दशमुखे तसेच वाशिम जिल्हा महिला सेवाधिकारी ज्योतीताई उगले यांनी केले आहे.
Users Today : 12