मेहकर, दि. २१ (प्रतिनिधी) :
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले. आजच्या परिस्थितीत त्यांच्या तत्वांचे अनुसरण केल्यास समाज उंचीवर जाईल, असे प्रतिपादन सिद्धार्थ खरात यांनी केले.
मेहकर येथील शिवाजी पार्कमध्ये नगर परिषदेच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या अध्यक्षतेखाली १९ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी महात्मा जोतिराव फुले, अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना आ. खरात म्हणाले की, सत्ता प्रबळ झाली की काही राजकारणी आपल्या निष्ठा व प्रतिज्ञा विसरतात; मात्र शिवाजी महाराजांनी तत्कालीन शक्तीसमोर युक्तीचा वापर करून आदर्श निर्माण केला. “म्हणूनच शिवाजी महाराज मला महान वाटतात,” असे ते म्हणाले.
यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे, तहसीलदार नीलेश मडके, तालुका युवा प्रमुख आकाश घोडे, नगर परिषद सदस्य सतीश ताजने, नितीन तुपे, पत्रकार ज्ञानदेव मानवतकर, निसार अन्सारी आदींची उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणातून नगराध्यक्ष गारोळे यांनी शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडला. कैलास सुखधाने, डॉ. सुभाष लोहिया, महेश रिंढे, अमर घोडे यांनीही मनोगते व्यक्त केली.
Users Today : 1