चिखला:
काकड येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, तसेच निरपराध नागरिकांवर होणारी कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी डॉ. सुनील कांयदे यांनी केली आहे.
घटनेचा निषेध व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तींचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, त्यांनाही विनाकारण गोवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ राजकीय हेतूने काही विशिष्ट लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा प्रकारे वातावरण तापवून समाजात तणाव निर्माण करणे योग्य नसून प्रशासनाने जबाबदारीने भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.
“जर खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला विरोध झाला असता, तर आम्ही स्वतः त्याविरोधात उभे राहिलो असतो. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. आम्ही सर्वजण शिवरायांच्या विचारांचे आहोत आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच भूमिका मांडणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात जे कोणी प्रत्यक्ष दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी; मात्र निरपराध लोकांवर अन्यायकारक कारवाई झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पुराव्यांच्या आधारे निर्णय घ्यावेत आणि संपूर्ण सत्य पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजात शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी निष्पक्ष चौकशी अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Users Today : 47