डोणगाव प्रतिनिधी :
दि. १९ फेब्रुवारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि रयतेचे राज्य कसे असावे, याचा आदर्श जगाला घालून देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव! जगभरात शिवजयंतीचा उत्साह असताना, डोणगाव येथे मात्र केवळ गाजावाजा न करता ‘विचारांची शिवजयंती’ साजरी करून एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला.
अलीकडच्या काळात शिवजयंती साजरी करताना मूळ विचारांचा विसर पडतो की काय, अशी परिस्थिती दिसते. मात्र या सर्व बाबींना छेद देत डोणगाव येथील युवा नेते अमोल धोटे यांनी सर्वसामान्यांच्या हिताची शिवजयंती साजरी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान आणि रयतेची काळजी घेण्याची शिकवण दिली. हाच वारसा जपत अमोलभाऊंनी यावर्षी एक अनोखा उपक्रम राबवला. गावातील गरजू माय-माऊलींना साडी-चोळीचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. साडी-चोळी स्वीकारताना प्रत्येक माता-भगिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
“खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांची हीच मानवंदना,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे परिसरात अमोलभाऊ धोटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी निलेश सदावर्ते, जुबेर भाई शेख तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
केवळ मिरवणुका आणि डीजे न लावता, उपेक्षित व गरजूंना मदतीचा हात देत साजरी झालेली ही ‘विचारांची शिवजयंती’ डोणगावच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली आहे.
Users Today : 9