मालेगाव प्रतिनिधी :
तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे Sant Gadge Baba यांची १५० वी जयंती ग्रामपंचायतच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. स्वच्छता अभियानाचे जनक म्हणून ओळख असलेल्या गाडगेबाबांच्या विचारांचा जागर यानिमित्त करण्यात आला.
दि. २३ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत बोर्डी (कोल्ही गट) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तुळशीराम चव्हाण होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आर. जी. चौधरी उपस्थित होते.
जयंतीनिमित्त गावात विशेष ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संकल्प केला. गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व परिसर स्वच्छ करून गाडगेबाबांच्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्यात आले.
कार्यक्रमात सरपंच तुळशीराम चव्हाण यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. “संत गाडगे महाराज हे चालते-बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या विचारांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले,” असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुण्यांनीही गाडगेबाबांनी दिलेल्या स्वच्छतेच्या व सामाजिक समतेच्या संदेशाचे महत्त्व अधोरेखित करत गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सचिव गजानन दहात्रे, ग्रामपंचायत शिपाई विलास गडदे, उपसरपंच पूजा माणिक तागड, कान्हू रामचंद्र देवळे, जया विनोद तुर्के, मानकरना अशोक नवघरे, सपना रखी गुडदे, गोपाल इंगळे, रघुनाथ देवळे, पुंजाजी तुर्के, महिला बचत गटाच्या सदस्या, शालेय विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
Users Today : 45