करवंड प्रतिनिधी :
स्वराज्याच्या इतिहासातील भावनिक आणि ऐतिहासिक घटना असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विवाहस्मृतीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या *“करवंड महोत्सवा”*त सर्वपक्षीय, सर्वधर्मीय व सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी करवंड येथील बाबन बुर्जी येथे भेट देऊन महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
१५ एप्रिल २०२६ रोजी भव्य आयोजन
ऐतिहासिक परंपरेनुसार इ.स. १५ एप्रिल १६५६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई इंगळे यांचा विवाह झाल्याची स्मृती जपण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड येथे १५ एप्रिल २०२६ रोजी भव्य “करवंड महोत्सव” आयोजित करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर महोत्सवाचे संकल्पक तथा बावन बुरुज बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुनील जवंजाळ पाटील, अरविंद बापू देशमुख, हरीरुद्र राजे इंगळे, पत्रकार गणेश निकम, अण्णासाहेब म्हळसने तसेच ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. यावेळी माजी सभापती ज्ञानेश्वर सुरोशे, माजी सरपंच प्रवीण पाटील, बिंदू इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
करवंड — शिवस्मृतींचे केंद्रस्थान
करवंड हे गाव स्वराज्याच्या इतिहासाशी निगडित पवित्र भूमी मानले जाते. स्वराज्याचे निष्ठावंत सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या गुणवंताबाई यांच्याशी शिवरायांचा विवाह झाल्यामुळे या गावाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे करवंड ही केवळ सासुरवाडी नसून शिवस्मृतींचे केंद्रस्थान मानले जाते.
आजपर्यंत शिवजयंती, विजय दिन, गडसंवर्धन मोहिमा असे विविध उपक्रम झाले असले, तरी विवाहस्मृतीवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील उत्सव प्रथमच होत आहे. हा सोहळा केवळ ऐतिहासिक कार्यक्रम न राहता जनतेचा लोकोत्सव व्हावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 38