छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
चिखली ;मेळाव्याच्या माध्यमातून समाज हा एकत्र येतो, जातीय व्यवस्था संपवण्यासाठी आंतरजातीय तसेच पोट जातींमध्येसुद्धा विवाह व्हावे, याकरिता ऋणानुबंध समाज विकास संस्था व मानवसेवा मल्टी पर्पज फाउंडेशन चिखली अंतर्गत ऋणानुबंध विवाह मंडळ स्तुत्य उपक्रम राबवत असल्याचे प्रतिपादन प्रा डॉ सुभाष राऊत यांनी केले.
ऋणानुबंध विवाह मंडळ चिखली तर्फे बौद्ध उपवधू-वर परिचय मेळावा रविवार (ता.२२) रोजी छत्रपती शाहू महाराज सभागृह पंचायत समिती चिखली येथे पार पडला. यावेळी नगराध्यक्ष चिखली पंडितराव देशमुख, प्रा डॉ सुभाष राऊत, ऍड विजयकुमार कस्तुरे, बांधकाम सभापती विष्णू जोगदंडे, नगरसेवक सुनीताताई प्रकाश शिंगणे, नगरसेवक सुप्रियाताई प्रशांत भटकर,नगरसेवक अश्विनीताई बाळू जाधव, नगरसेवक रत्नदीप शिनगारे, दयानंद निकाळजे, अध्यक्ष फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती विकी शिनगारे, वंचित अध्यक्ष बाळू भिसे,यांच्यासह अन्य मान्यवर धम्मपिठावर विराजमान होते.
मेळाव्याला राज्यभरातून विविध जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते. परिचय मेळाव्यात नोंदणी करणाऱ्यांना कार्यक्रमस्थळी प्रवेश देण्यात आला. चिखली नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला.
समाजातील सर्व स्तरातील उपवर वधूंनी यावेळी आपला परिचय करून दिला. यामध्ये डॉक्टर, इंजिनियर्स, वकील, सरकारी नोकरदार, निमसरकारी नोकरदार,मजूर, उद्योजक, शेतकरी, घटस्फोटीत, विधवा, विधुर यांनी आपला परिचय करून दिला.
संस्थेच्या माध्यमातून निराधार वृद्धाची सेवा करणे हिच खरी मानवसेवा आहे. मानवसेवा फाउंडेशन ला वृद्धाश्रमला शक्य ती मदत करू असे प्रतिपादन नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी सत्काराला उत्तर देतांना केले.
योग्य जीवनसाथी निवडण्याकरिता परिचय मेळावा फार उपयोगी ठरत आहे. समाजाने लग्न सोहळ्यात अमाप खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने आपल्या मुला-मुलींचा विवाह लावून द्यावा. तसेच मुलींच्या वडिलांनी मोठ्या प्रमाणात अपेक्षा न ठेवता शिथिलता बाळगून समाजातील योग्य वर निवडावा. याकरिता प्रशांत डोंगरदिवे यांनी मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन मेळाव्याचे अध्यक्ष डॉ सुभाष राऊत यांनी केले.
मानवसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे यांनी सूत्रसंचालन तर एस एस साळवे यांनी आभार प्रदर्शन केले. सोहळ्याला यशस्वी करण्याकरिता रुपालीताई डोंगरदिवे, रघुवीर डोंगरदिवे, रवींद्र जाधव, मायाताई डोंगरदिवे, वनिताताई जाधव, मनीषा ताई इंगळे,सुनील इंगळे, जीवन जाधव, निताताई डोंगरदिवे, रमेश साळवे यांनी अथक परिश्रम घेतले.
Users Today : 9