चिखली, दि. २५ (प्रतिनिधी) –
स्वराज्याच्या इतिहासातील भावनिक आणि ऐतिहासिक घटना असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विवाहस्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘करवंड महोत्सवा’त सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आणि सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.
२१ फेब्रुवारी रोजी करवंड येथील बावनबुरुजी येथे भेट देऊन त्यांनी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी आयोजक व ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी महोत्सव लोकोत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्यावर भर दिला.
इ.स. १५ एप्रिल १६५६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई इंगळे यांचा विवाह पार पडल्याची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड येथे १५ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘करवंड महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर राहुल बोंद्रे यांनी स्थळाला भेट देत आयोजनाची माहिती घेतली. करवंड हे स्वराज्याच्या इतिहासाशी निगडित पवित्र स्थळ मानले जाते. स्वराज्याचे निष्ठावंत सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या गुणवंताबाई यांच्याशी महाराजांचा विवाह झाल्यामुळे या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे करवंड ही केवळ सासुरवाडी नसून शिवस्मृतींचे केंद्रस्थान आहे, असे त्यांनी सांगितले.
Users Today : 45