अंबरनाथ –
ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंबरनाथ येथील आनंदनगर MIDC परिसरात आज सकाळी एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले असून शेजारील दोन कंपन्यांनाही आगीचा फटका बसला आहे.
गणेश केमिकलमध्ये स्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश केमिकल कंपनी येथे झालेल्या पहिल्या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कंपनीतील रसायने थेट रस्त्यावर सांडली. त्यामुळे रस्त्यावरही आगीचा भडका उडाला.
आकाशात काळ्या धुराचे लोट आणि आगीच्या प्रचंड ज्वाळा कित्येक किलोमीटर अंतरावरून दिसत होत्या. कंपनीत साठवलेल्या रसायनांमुळे एकामागून एक स्फोट होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कामगारांमध्ये घबराट
स्फोट होताच कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये मोठी खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी अनेक कामगारांनी हातातील काम सोडून तात्काळ बाहेर धाव घेतली. प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
आग शेजारील कंपन्यांपर्यंत
या आगीचा प्रसार शेजारील मिरॅकल केबल आणि क्लाउड नाईन कंपनी या कंपन्यांपर्यंत झाला आहे. त्यामुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात मोठी धावपळ सुरू झाली.
अग्निशमन दलाची धावपळ
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र रसायनांमुळे आग वारंवार भडकत असल्याने आणि दाट धुरामुळे दृश्यता कमी झाल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी डोंबिवली MIDC येथे झालेल्या भीषण स्फोटांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Users Today : 24