धाड :
Reliance Jio चे नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कॉल न लागणे, इंटरनेटचा वेग अत्यंत कमी होणे तसेच वारंवार सिग्नल गायब होणे या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी संतप्त ग्राहक आता मोबाईल क्रमांक इतर कंपन्यांकडे पोर्ट करण्याकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Dhad तसेच परिसरातील ग्रामीण भागात जिओचे नेटवर्क अत्यंत मंदावल्याने संवाद साधणे कठीण झाले आहे. अनेकांना फोनवर बोलण्यासाठी घराबाहेर किंवा छतावर जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. इंटरनेट सेवा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बाधित होत असून शासकीय कार्यालयांमधील अनेक ऑनलाइन कामेही ठप्प झाली आहेत.
महसूल, बँकिंग तसेच दैनंदिन व्यवहारांवरही या समस्येचा परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. डिजिटल युगात नेटवर्क समस्येमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, नेटवर्क समस्येमुळे धाड परिसरात जिओचे सिम कार्ड बदलून इतर कंपन्यांकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मोबाईल दुकाने आणि सेवा केंद्रांवर नंबर पोर्ट करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
विद्यार्थी आणि व्यावसायिकांचे काम इंटरनेटवर अवलंबून असल्याने ऑनलाइन वर्ग, स्पर्धा परीक्षांचे अर्ज तसेच ई-मेल पाठविताना नेटवर्क गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तरुणांमध्येही कंपनीविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
“पैसे देऊनही योग्य सेवा मिळत नसेल तर कंपनी बदलणेच योग्य,” अशी भूमिका घेत अनेक ग्राहक मोबाईल नंबर पोर्ट करत असल्याचे मोबाईल विक्रेत्यांनी सांगितले.
Users Today : 6