Sindkhed Raja :
तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. छोटे-मोठे कोणतेही काम ‘चिरीमिरी’शिवाय होत नसल्याचा आरोप नागरिक करत असून अनेक कामांच्या फाईल्स गेल्या सहा-सहा महिन्यांपासून कार्यालयात प्रलंबित असल्याचे चित्र दिसून येत आहे.
साध्या कामासाठीही नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असून विविध कारणे सांगत कामे लांबवली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या लालफितशाहीमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले असून कार्यालयाविषयी नाराजी वाढत आहे.
तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय हे नागरिकांसाठी सर्वाधिक त्रासदायक ठरत असल्याचे बोलले जात आहे. एका चकरात कोणतेही काम होत नसल्याने नागरिकांना अनेकदा ये-जा करावी लागत आहे. तक्रार केल्यास भविष्यात स्वतःचे काम अडकण्याची भीती असल्याने अनेकजण उघडपणे बोलण्यास टाळाटाळ करतात.
तालुक्यात एकूण १०७ गावे असून भौगोलिक क्षेत्रही मोठे आहे. विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना एका कामासाठी पूर्ण दिवस खर्च करावा लागतो. काही प्रकरणांमध्ये आर्थिक देवाणघेवाण करूनही नागरिकांना दोन-दोन महिने चकरा माराव्या लागत असल्याचे सांगितले जाते.
विविध कामांसाठी ठरलेले ‘दर’
या कार्यालयात जागेची नोंद, जमीन मोजणी, शेती मोजणी, संपत्तीवरील बोजा चढवणे अथवा उतरवणे यासारख्या कामांसाठी कथितपणे वेगवेगळे दर ठरवून आर्थिक देवाणघेवाण केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही प्रतिष्ठित व्यापारी, उद्योजक तसेच प्रभावशाली व्यक्ती देखील मध्यस्थामार्फत काम करून घेत असल्याची चर्चा आहे.
कारवाईची मागणी
काही वर्षांपूर्वी या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्याची घटना घडली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर Prataprao Jadhav, Makarand Abba Patil तसेच Manoj Kayande यांनी या कार्यालयाच्या कारभाराकडे लक्ष देऊन चौकशी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
Users Today : 33