संग्रामपूर :
समाजातील प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रसंतांचे विचार अंगीकारले, तर समाजातील अनेक समस्या आपोआप दूर होतील. आजच्या कठीण काळातही राष्ट्रसंतांचे विचार माणसाला नवी दिशा आणि प्रेरणा देतात, असे प्रतिपादन हभप प्रल्हाद अस्वार यांनी केले.
ते तालुक्यातील वरवट बकाल येथील श्रीराम मंदिर येथे आयोजित संगीतमय तुलसी रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात कीर्तनातून बोलत होते. या कार्यक्रमास भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.
या प्रसंगी त्यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, संतांचे विचार समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करतात. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी संतांचे मार्गदर्शन आजही तितकेच महत्त्वाचे आहे.
तालुक्यातील वरवट बकाल येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम मंदिरात संगीतमय तुलसी रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे वाचन हभप श्रीकृष्णकृपा मृती महाराज (अयोध्या) यांच्या मधुर वाणीतून होत आहे.
कार्यक्रमादरम्यान दररोज पहाटे काकड आरती, रामायण कथा वाचन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री विविध कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीतमय तुलसी रामायण कथेसाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे
Users Today : 25