हिवरा आश्रम –
जगातील धर्मांधता व हिंसा नष्ट होऊन माणूस म्हणून दुसऱ्याला स्वीकारण्याची विशालता आपल्या हृदयात निर्माण व्हावी. विवेकानंदांच्या शिकवणुकीमुळे हा विचार प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न विवेकानंद आश्रम या संस्थेमध्ये दिसून येतो. त्यामुळे विवेकानंद आश्रम ही जग जोडण्याचे स्वप्न पाहणारी संस्था आहे, असे प्रतिपादन हभप चारूदत्त आफळे महाराज यांनी केले.
येथील प.पू. शुकदास महाराज समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित रामकथेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
रामकथेच्या समारोपानंतर हभप आफळे महाराज यांच्या हस्ते विवेकानंद कृषी महाविद्यालयातील नूतन संगणक प्रयोगशाळेचे (कॉम्प्युटर लॅब) उद्घाटन करण्यात आले. सुमारे ५० लाख रुपये खर्चून उभारलेल्या या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना एमएससीआयटीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेशआप्पा खबुतरे उपस्थित होते. देशाची प्रगती ही कृषी प्रगतीतून होत असते. शेतकरी व त्यांच्या मुलांना कृषी विषयाचे ज्ञान मिळावे तसेच तंत्रशुद्ध शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी संगणक प्रयोगशाळेचा मोठा उपयोग होईल, असेही आफळे महाराज यांनी सांगितले. बदलत्या हवामानामुळे शेतीपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठीही या प्रयोगशाळेचा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुपारी ३ वाजता त्यांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
यावेळी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, अशोक पाध्ये, अशोक थोरहाते, संतोष गोरे, आत्मानंद थोरहाते, प्रशांत हजारी, नारायण भारस्कर, कैलास भिसडे, अशोक गिऱ्ह, श्याम नवस्थळे, शशिकांत आप्पा बेंदाडे, गजानन ठाकरे, निलेश रामेकर, प्राचार्य आर. डी. पवार, डॉ. सुभाष कालवे, मंगेश जकाते, पंढरीनाथ शेळके, शिवदास सांबपूरे, संजय भारती, सज्जनसिंग राजपूत, निवृत्तीनाथ येवले, गंगाधर निकस, दयानंद थोरहाते, दीपक पवार आदी उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विवेकानंद आश्रमाचे कार्यकर्ते व परिसरातील गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Users Today : 9