सिंदखेड राजा
अमडापूर–साखरखेर्डा–मलकापूर पांगरा मार्गाचे समृद्धी महामार्गाशी जोडणीसाठी रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान रस्त्यालगत असलेल्या जुन्या, डेरेदार झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर रस्ता परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, समृद्धी महामार्गाशी जोडणी सुलभ व्हावी यासाठी त्याचे रुंदीकरण केले जात आहे. मात्र, या प्रक्रियेत अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या मोठ्या झाडांची सर्रास कत्तल केली जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
या झाडांमुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखला जात होता. तसेच प्रवाशांना सावली आणि स्थानिकांना शुद्ध हवा मिळत होती. झाडांच्या तोडीमुळे भविष्यात तापमानवाढ, प्रदूषण आणि पर्यावरणीय असंतुलन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, वृक्षतोडीसाठी नेमकी किती झाडांना परवानगी देण्यात आली आहे, याबाबत वन विभागाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. त्यामुळे नियमांचे पालन होत आहे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पर्यावरणीय नियमांनुसार जितकी झाडे तोडली जातात, तितकीच किंवा त्यापेक्षा अधिक झाडे इतर ठिकाणी लावणे बंधनकारक असते. मात्र, प्रत्यक्षात अशा प्रकारचे वृक्षारोपण होताना दिसत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवावे, तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसून, पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Users Today : 27