मुंबई
राज्यात नवीन शासन निर्णयानुसार तब्बल १ लाख ९४ हजार ५० विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, ही संपूर्ण प्रक्रिया येत्या एका महिन्यात पूर्ण करण्याचे कडक निर्देश महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांनी दिले आहेत.
मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलताना बावनकुळे यांनी सर्व जिल्ह्यांनी आपापले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे स्पष्ट केले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील १५ दिवसांत पालकमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून अंतिम याद्या मंजुरीसाठी महसूल विभागाकडे पाठवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
या नव्या प्रक्रियेमुळे राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील विविध शासकीय कामांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्हा प्रशासनांना विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
