गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून, शेतकरी आणि वाहनधारक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ही परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणून इंधनाचा सुरळीत पुरवठा करावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश नळगे यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महेश नळगे यांनी म्हटले आहे की, राज्यातील विविध भागांत पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे अनेक पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून, काही ठिकाणी कॅन आणि ड्रममध्ये इंधन साठवण्याचे प्रकार वाढले आहेत.
याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असून, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे खोळंबली आहेत. ट्रॅक्टर
व कृषी यंत्रांसाठी डिझेल न मिळाल्याने शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत थांबावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील काही पेट्रोलपंपांवर पुरवठा कमी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुरेसा इंधनसाठा उपलब्ध करून द्यावा तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, राज्य सरकारने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून इंधन साठवू नये, असे आवाहन केले आहे. मात्र जालना जिल्ह्यात अनेक पेट्रोलपंपांवर अद्यापही नागरिकांची मोठी गर्दी कायम असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाने परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही महेश नळगे यांनी दिला आहे.
