वाशिम : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली असून ग्रामीण भागातील राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मावळते जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईकडे कूच केल्याची माहिती समोर आली आहे. ते भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश मापारी यांच्या नेतृत्वाखाली २३ मे रोजी ३० ते ३२ वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. या ताफ्यात सरपंच, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच बाजार समितीचे माजी सदस्य आणि ग्रामीण भागातील शेकडो सक्रिय कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिवसेनेचे काही शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, युवा सेना पदाधिकारी तसेच इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याची माहितीही पुढे आली आहे. सुरेश मापारी यांच्या या अनपेक्षित राजकीय निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.
## मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
वाशिम जिल्ह्यातील हे सर्व पदाधिकारी मुंबईत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुका, स्थानिक सत्ताकारण आणि ग्रामीण राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता पक्षप्रवेशानंतर वाशिम जिल्ह्यातील राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Users Today : 30