जळगाव जामोद : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात’ बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळवत जळगाव जामोद तालुक्यातील सुलज ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला असून झाडेगाव ग्रामपंचायतीने द्वितीय स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय यशामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis, ग्रामविकास मंत्री Jaykumar Gore आणि ग्रामविकास राज्यमंत्री Yogesh Kadam यांच्या संकल्पनेतून राज्यभर हे अभियान राबविण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. आर. मोहन तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
जळगाव जामोद तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग घेतला होता. चुरशीच्या स्पर्धेत सुलज ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळविले. या कामगिरीमुळे ग्रामपंचायत १५ लाख रुपयांच्या बक्षिसासाठी पात्र ठरली आहे.
अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांची तपासणी नागपूर जिल्ह्यातील मौदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश बेहेरकर व त्यांच्या पथकाने केली.
या यशामागे जि.प. सीईओ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी मोरे आणि पंचायत विस्तार अधिकारी राजेंद्र कोलते यांनी गावागावांत नियमित भेटी देत तपासणी व मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात आले.
ग्रामपातळीवर सरपंच लता मधुकर टापरे, ग्राम अधिकारी कविता जवंजाळकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, शिक्षक, महिला बचत गट, आशा वर्कर्स तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अरुण घोटे, राम इंगळे आणि पंचायत समितीचे कर्मचारी यांच्या एकजुटीमुळे हे यश शक्य झाल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Users Today : 30