पुणे, ता. १ : लेखक, वक्ता, सूत्रसंचालक, क्रीडा पत्रकार, क्रीडा समालोचक, दांडगा जनसंपर्क असणारा माणूस तसेच कुटुंबवत्सल असलेले प्रकाश पायगुडे यांच्या निधनाने माणूसपण जपणारे सर्वंकष व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत पायगुडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, पायगुडे यांचे सुपुत्र अंबरीश आणि अधीश पायगुडे, बंधू शरद आणि अविनाश पायगुडे, पत्नी आशालता पायगुडे उपस्थित होते.‘नि:स्वार्थ बुद्धीने काम करणारे कार्यकर्ते दुर्मीळ होत असताना पायगुडे यांचे निधन ही परिषदेची मोठी हानी आहे’’, असे प्रा. जोशी म्हणाले. ‘‘बाबांनी आपल्या अफाट लोकसंपर्काचा उपयोग कधीही स्वतःसाठी नाही, तर संस्थेसाठीच केला’’, असे अधीश पायगुडे म्हणाले. डॉ. सतीश देसाई, रवी चौधरी, जयराम देसाई, रवींद्र बेडकिहाळ, वि. दा. पिंगळे, उद्धव कानडे, अभय जबडे, डॉ. मेधा सिधये, दीपक करंदीकर, डॉ. नीलिमा गुंडी, संजय नहार, दत्ता हलसगीकर, श्रीधर कसबेकर, डॉ. बुधाजीराव मुळीक, राजन लाखे, सुरेशचंद्र पाध्ये, बंडा जोशी, श्रीकृष्ण पुरंदरे यांनीही श्रद्धांजली वाहिली. उपस्थितांमध्ये भारती पांडे, नंदा सुर्वे, लीला गांधी यांचा समावेश होता.
‘स्मृती पुरस्कारा’ची घोषणा
प्रा. प्र. ना. परांजपे यांनी प्रकाश पायगुडे यांच्या नावाने महाराष्ट्र साहित्य परिषदेतील उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास पाच हजार रुपयांचा पुरस्कार दिला जावा, अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या वर्षीपासून परिषदेच्या वर्धापनदिन समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.
Users Today : 9