मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या कारचे ब्रेक निकामी झाल्याने कार थेट ३५ फूट खोल विहिरीत कोसळली. या अपघातात अमरावती येथील तीन तरुण गंभीर जखमी झाले असून सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण कारने प्रवास करत असताना अचानक वाहनाचे ब्रेक फेल झाले. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या खोल विहिरीत जाऊन पडली. अपघात इतका भीषण होता की काही काळ परिसरात एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर १०८ रुग्णवाहिका सेवेचे EMT दीपक बारस्कर आणि पायलट मोहित चाडोकर यांनी मोठे धाडस दाखवत विहिरीत उतरून बचावकार्य सुरू केले. गावकऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर तिन्ही तरुणांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
जखमींना तातडीने प्रथमोपचार देऊन भैंसदेही येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात तिघेही गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
वेळेवर करण्यात आलेल्या बचावकार्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून गावकरी आणि रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान, या अपघातामुळे वाहनांची नियमित तपासणी आणि सुरक्षित वेगाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
Users Today : 38