चेन्नई :
तामिळनाडूचे मुख्यमंत्री Vijay यांच्या एका साध्या पण प्रभावी कृतीची सध्या राज्यासह देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारी कार्यालयांमध्ये वर्षानुवर्षे दिसणारी ‘व्हीआयपी टॉवेल संस्कृती’ मोडीत काढत त्यांनी स्वतःच्या खुर्चीवरील पारंपरिक पांढरा टॉवेल हटवला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय पदाधिकाऱ्यांच्या खुर्चींवर पांढरा टॉवेल ठेवण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ही पद्धत ब्रिटिशकालीन व्हीआयपी मानसिकतेचे प्रतीक मानली जाते. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ती Licypriya Kangujam यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री विजय यांना ही प्रथा बंद करण्याचे आवाहन केले होते.
विशेष म्हणजे, या आवाहनानंतर अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्री विजय यांनी स्वतःच्या खुर्चीवरील टॉवेल हटवला. कोणताही गाजावाजा किंवा अधिकृत घोषणा न करता त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून संदेश दिल्याने त्यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय कार्यक्रमांतील छायाचित्रांमध्ये हा बदल स्पष्टपणे दिसून आला. पूर्वी खुर्चीवर असलेला पांढरा टॉवेल नंतरच्या कार्यक्रमांमध्ये हटवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लिसिप्रिया कांगुजम यांनी सोशल मीडियावर दोन्ही छायाचित्रे शेअर करत “सामान्य माणसाचा आवाज ऐकणारा मुख्यमंत्री” अशा शब्दांत विजय यांचे आभार मानले.
या घटनेनंतर सोशल मीडियावर मुख्यमंत्री विजय यांच्या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात समर्थन होत असून इतर राज्यांतील मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठीही हा आदर्श असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या विविध निर्णयांमुळे विजय यांनी वेगळी ओळख निर्माण केल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
Users Today : 38