शेतकऱ्यांच्या हातावर तुरी, सरकार घेते टक्केवारी; विरोधकांचा आरोप, सरसकट कर्जमाफीसाठी केले आंदोलन

Khozmaster
2 Min Read

नागपूर : अवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकरी हतबल झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीदेखील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी सत्तापक्षाला घेरत कापूस, सोयाबीन आणि धानाला भाव मिळावा यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे देत जोरदार घोषणाबाजी केली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलनात कापसाच्या बोंडाच्या माळा घालून ‘शेतकऱ्यांच्या हातावर देते तुरी, सरकार घेते टक्केवारी’, ‘अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पंचनामे करणारे सरकार सुस्त,’ ‘अवकाळीने निघते शेतकऱ्यांचे दिवाळे, गद्दारांना लागले मंत्रिमंडळ विस्ताराचे डोहाळे,’ ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रुंचा सागर, सरकार देते नुसते गाजर,’ अशा लक्षवेधी घोषणा दिल्यात. यावेळी अंबादास दानवे म्हणाले, ‘कापूस, धान आणि सोयाबीनला भाव मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. सरकारची दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा खोटी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शहरालगतच्या शेतात गेले पण त्यातून काहीही साध्य झालेले नाही. ज्यावेळी जायचे होते तेव्हा ते तेलंगणच्या निवडणुकीत प्रचार करण्यात व्यस्त होते.’राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून कर्जवसुली सुरू असल्याची टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. ‘राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. मागील दोन वर्षांत यवतमाळ जिल्ह्यात ४६० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत तरीदेखील सरकार चर्चा करायला तयार नाही’, असे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार अनिल देशमुख म्हणाले. या आंदोलनात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अशोक चव्हाण, अनिल देशमुख, नाना पटोले, अभिजित वंजारी, रवींद्र वायकर, सचिन अहिर आदींचा सहभाग होता.सरकारने काढावा मार्ग

एकीकडे बांगलादेशने संत्र्यासह विविध फळांवर आयात शुल्क वाढविले आहे. तर दुसरीकडे सरकारने कांदा निर्यात बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, राज्य सरकारने याबाबत अद्याप केंद्राकडे कसलीही बोलणी केलेली नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी साखर कारखान्यांकडून बनविलेले इथेनॉल न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारखानदारदेखील आर्थिक अडचणीत सापडले आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्याशी चर्चा करून मार्ग काढावा, अशी आमची मागणी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील म्हणाले.

0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *