रस्त्यांची फोडाफोडी वैताग आणणारी; शहराचा एकही भाग सुटला नाही; प्रशासनातील असमन्वयामुळे नागपूरकर वेठीस

Khozmaster
3 Min Read

नागपूर : नागपूरकरांची सर्वात जास्त चिडचीड जर कशाने होत असेल तर ती होते, रस्त्यांच्या रोज होणाऱ्या फोडाफोडीने. अहो, राजकारणातली फोडाफोडी एकदाची लवकर शमेल. मात्र, नागपुरातील रस्त्यांची फोडाफोडी सदोदित सुरू असते. त्यामुळे घरून घरून निघताना नागपूरकर धास्तावलेलेच असतात.
-उपराजधानीतील गुळगुळीत रस्त्यांची देशभरात चर्चा होते. मात्र, एकीकडे रस्ते वा सौंदर्यीकरण करायचे आणि त्यावर लगेच हातोडा हाणायचा, असा प्रताप केवळ याच शहरात शक्य आहे.

-महापालिका असो की अन्य कोणतीही यंत्रणा, एक तर रस्ते करत नाहीत. काम सुरू केल्यास कासवछाप गती असते आणि केल्यानंतर लगेच फोडण्याचे काम करून जनतेचा पैसा वाया घालवला जातो, हे वास्तव आहे.

-शहरातील असा एकही भाग नाही, जेथे रस्ते फोडले गेले नाहीत. सेंट्रल बाजार रोड, लक्ष्मीनगर या भागांत रस्ते आणि फुटपाथ फोडण्यात आले. सद्यस्थितीत रस्ताचे काम सुरू असलेल्या अमरावती रोड विद्यापीठ व महाराजबाग दरम्यान डागडुजी सुरू झाली.

-पारडी येथील उड्डाणपुलाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९ वर्षांपूर्वी झाले. या संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी रस्ते खणलेले दिसून येतात. सदर बोहरा मशिदीसमोर खोदून ठेवलेला आहे.

-झिंगाबाई टाकळी येथील रस्त्याची अशीच स्थिती आहे. प्रतापनगर चौकातून सोमलवार शाळेकडे जाणारा रस्ता प्रदीर्घ काळानंतर तयार झाला. रस्ता होत नाही तोच मोठ्या पाईप लाईनसाठी संपूर्ण रस्ता खणला.

-हसनबाग, नंदनवन या परिसरातील रस्त्यांची अशीच दुर्दशा आहे. भूमिगत वाहिनी आणि जलवाहिन्यांसाठी रस्ते खोदलेले दिसून येतात. बरेचदा सणासुदीचे दिवस वा पावसाचा इशारा असतानाही खोदकाम करून नागरिकांना वेठीस धरले जाते.

-जी-२० परिषदेसाठी वर्धा रोडवर युद्धपातळीवर काम करण्यात आले. यानंतर ठिकठिकाणी फुटपाथ खोदले. सिमेंट काँक्रिटचा रस्ता ड्रिल करून फोडण्याचे धाडस यंत्रणा करत असल्यास अन्य रस्त्यांची किती केवलवाणी अवस्था असेल, याचा विचार केलेला बरा.

-प्रशासनाच्या या ‘पराक्रमा’मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कोण या रस्त्यांचे नियंत्रण करते, निविदा प्रक्रिया काढण्यापूर्वी अन्य यंत्रणांना विश्वासात घेतले जात नाही का, सर्वसामान्यांच्या कराचा हा पैसा असा कसा वाया का घातला जातो, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

-दीक्षाभूमीपासून शततारका अपार्टमेंटपर्यंत नीरीचा रस्ता काँक्रिटचा करून सुंदर झाडे लावण्यात आली. गट्टू लावून सौंदर्यीकरण केले. यासाठी माजी महापौर संदीप जोशी यांनी वेगळ्या प्रकारची वृक्षराजी लावली. अवघ्या काही महिन्यांत फुटपाथ फोडण्यात आले होते.-तत्कालीन महापालिका आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी यंत्रणांना तंबी देऊन शिस्त लावली होती. कोणत्याही यंत्रणेची रस्ता फोडण्याची हिंमत नव्हती.

-वीजकंपन्या (तेव्हा मंडळ) असो नाही तर, पेयजलाची पाइपलाइन, कोणतेही काम आधी सूचना देऊन किंवा रस्ता होण्यापूर्वी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

-फुटपाथ बांधून टी. चंद्रशेखर यांनी विविध प्रकारच्या वाहिन्यांसाठी व्यवस्था केली. दोन दशकानंतरही रस्ते तयार करणे आणि खोदणे इतकेच काम प्रशासनाला कळते.

-तत्कालीन पोलिस आयुक्त उल्हास जोशी यांनी पार्किंगवरून हॉटेल्स आणि मंगल कार्यालयांना व्यवस्था करण्याची तंबी दिली. त्याचे काही वर्षे चांगले परिणाम दिसून आले. आता परत स्थिती जैसे थे आहे.शहराच्या सौंदर्यीकरणाची ‘वाट’

शहरातील रस्त्यांच्या तोडफोडीवरून कोणत्याच यंत्रणेत समन्वय नसल्याचे अधोरेखित होते. रस्त्यांचे मालक असणारे महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास वा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित रस्ता फोडणाऱ्या यंत्रणेवर कुठलीही कारवाई होत नाही. खणलेले रस्ते, नवीन रस्त्यांवर थाटलेली दुकाने व अतिक्रमण आणि फुटपाथ वा रस्त्यांवर उभी वाहने अशा विद्रूप दृश्यांनी शहराच्या सौंदर्यीकरणाची ‘वाट’ लावली जात आहे…

0 9 3 8 3 3
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *