नागपूर: राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात इथेनॉल निर्मितीवरील बंदी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत आणि कांदा निर्यातबंदीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोमवारी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहे. उद्धव ठाकरे सभागृहात येणार असल्याने ते काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळातील एन्ट्रीपूर्वीच त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या शाब्दिक लढाईचा श्रीगणेशा केला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त हजेरी लावण्यापुरते हिवाळी अधिवेशनाला येत असल्याचे त्यांनी म्हटले. ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, पंचनामे पूर्ण झाल्यावर मदत देऊ: एकनाथ शिंदे
राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. यापूर्वी आपण अतिवृष्टीवेळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एनडीआरएफचे निकष बदलले. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केली. अवकाळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभे आहे. कांदा निर्यातीबाबत मी स्वत: पियूष गोयल यांच्याशी बोललो आहे. त्यांना मी राज्यातील कांदा उत्पादक आणि एकूण परिस्थितीची माहिती दिली आहे. आम्हाला सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. इथेनॉलनिर्मितीवरील बंदीसंदर्भात आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊ. राज्यातील जनतेवर आम्ही कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. किंबहुना केंद्र सरकारची तीच भूमिका आहे. राज्यात अद्याप पंचनामे सुरु आहेत. नागपूर भागात नुकताच पाऊस पडला आहे. अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर अवकाळीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सगळे पंचनामे एकत्रित आल्यानंतर सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीविषयी निर्णय घेईल. पीकविम्याची अग्रिम रक्कम देण्याचा निर्णय अनेक कंपन्यांनी घेतला असून त्याचे वाटप सुरु झाले आहे. उर्वरित अडथळे दूर करण्याकडे राज्य सरकार लक्ष घालेल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Users Today : 34