नागपूर : ३२ वर्षांच्या युवकाला हे सरकार घाबरत असल्याचा दावा आदित्य ठाकरे करतात. मग, त्यांनी हिंमत असेल तर एकटे यावे. त्यांचे लग्नाचे वय झाले असून आता त्यांनी वडिलांना सोबत घेऊन फिरू नये, असा टोला आमदार नितेश राणे यांनी सोमवारी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना लगावला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात आमदार नितेश राणे यांचे उपराजधानीत आगमन झाले. याप्रसंगी त्यांनी मराठा आरक्षण, संजय राऊत, आदित्य ठाकरे, रोहित पवार, लव्ह जिहाद आदी मुद्द्यांवर भाष्य केले.
रोहित पवार राजकारणातला ओरी
रोहित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ओरी आहे. तो माहिती नाही कशाला यात्रा घेऊन निघाला आहे. ओरीला आपण किती गांभीर्याने घ्यायचे, हा प्रश्न आहे. उबाठाला संपविण्यासाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पुरेसे आहेत. तसेच शरद पवार गटाला संपविण्यासाठी राजकारणातील हा ओरी सक्षम आहे, असे आमदार नितेश राणे म्हणाले.
मराठा समाज शांतीप्रिय
गोपीचंद पडाळकर यांच्यावर चप्पल भिरकविणारे मराठा समाजाचे लोक नाहीत. मराठा समाज शांतताप्रिय आहे. मराठा समाजाने ५८ मोर्चे निघालेत. पण, कुणालाही धक्का लागला नाही. आता, कुठे देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची. कुठे पडाळकरांवर हल्ला करायचा. याला मराठा समाज म्हणत नाही. सध्या जे सुरू आहे ते मराठा समाजाला बदनाम करणारे आहे, असे आमदार नितेश म्हणाले.
Users Today : 2