मुंबई विशेष प्रतिनिधी ;-
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला दुजोरा मिळाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून विविध राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार आणि वादग्रस्त टीका केली आहे.
“दोन भाऊ एकत्र येत आहेत ही बाब चांगली असली, तरी नगरपरिषद, नगरपंचायतींपासून त्यांच्या पक्षांचा शेवटचा क्रमांक लागत आहे. ज्यांचा पक्ष कधी मुख्यमंत्री बनवण्याची ताकद ठेवत होता, तो आज संपुष्टात आला आहे,” असा हल्लाबोल नवनीत राणा यांनी केला.
राज ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्या म्हणाल्या,
“राज ठाकरे यांचा नारा पूर्वी ‘माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो’ असा होता. मात्र उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे. हे वैचारिक दुटप्पीपणाचं स्पष्ट उदाहरण आहे.”
यावेळी त्यांनी अधिक आक्रमक शब्दांत टीका करत म्हटले,
“उद्धव ठाकरे हे चादर चढवणारे आहेत आणि त्यांना मतदान करणारेही तसेच आहेत. मग आता भोंगे कुठे गेले? मशिदी कुठे गेल्या? हनुमान चालीसा कुठे गेली?”
महानगरपालिकांमध्ये यापुढे भाजपचाच आणि भगव्याचाच झेंडा फडकणार, असा दावा त्यांनी केला.
ठाकरे बंधूंच्या युतीनंतर शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांचा जल्लोष
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर मीरा–भाईंदर, ठाणे आणि इतर भागांत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कल परिसरात कार्यकर्त्यांनी पेढे वाटले, फटाके फोडले आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. “ठाकरे बंधू एकत्र” अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला.
ठाण्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयाबाहेरही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. युतीमुळे आगामी महापालिका निवडणुकांत नवे राजकीय समीकरण तयार होण्याची चर्चा रंगू लागली आहे.
Users Today : 11